खेड तालुका भाजपाचा आरोप : तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन
राजगुरूनगर -अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी बागायती 35 हजार व फळबागसाठी 50 हजार रुपये देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. हेक्टर 8 हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करू, अशी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ती तात्काळ पूर्ण करावीत. यासह इतर मागणीसाठी मागण्यांसाठी खेड तालुका भाजपच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयापुढे मंगळवारी (दि. 25) धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच राज्यात महिला सुरक्षित नाहीत महिलांवरील अत्याचार अन्याय वाढले आहेत. गुन्हेगारीला चाप बसण्याऐवजी त्यात वाढ होत आहे. कायद्याचा धाक या सरकाकडे राहिला नाही. राज्यात महिला सुरक्षित नसल्याने या सरकारचा जाहीर निषेध आहे. महिलांवरील अत्याचार अन्याय अशा घटनांना आळा बसण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, कालिदास वाडेकर, रामदास मेदनकर, क्रांती सोमवंशी, कैलास गाळव, अमृत शेवकरी, दिलीप वाळके, राजन परदेशी, संदीप सोमवंशी, सचिन लांडगे, किरण झिंजुरके, अजय जगनाडे, बाळासाहेब कहाणे, सुनील देवकर काळुराम पिंजण, प्रशांत कर्नावट, मनोहर सांडभोर, अमोल सांडभोर, संदीप वाळुंज, मंगेश गुंडाळ, संजय घुंडरे, किरण येळवंडे, मोहिनी राक्षे, घुले, संजय रौंधळ, बापू दौंडकर, सुधीर भोमाळे, प्रकाश कालेकर, विष्णू बोऱ्हाडे, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मागण्यांचे निवेदन खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध समस्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
आळंदी पाणी योजना स्थगिती उठवावी, मुंबई वांद्रे भीमाशंकर रस्ता झाला पाहिजे, बाह्यवळण रस्ता वाहतूक कोंडी याकडे लक्ष दिले जात नाही तालुक्यासह राज्यातील अनेक प्रश्न मागे पडत आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे भविष्यात हे प्रश्न सुटले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल. महिलांवरील अन्याय अत्याचार वाढल्याने हे सरकार निष्क्रिय आहे.
– अतुल देशमुख, खेड तालुका अध्यक्ष, भाजप
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याबरोबच शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. त्यांना आता कर्जमाफीतून वगळण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. सर्वप्रकारची कर्जे माफ करावीत. एमआयडीत स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे.
– शरद बुट्टे पाटील, गटनेते, जिल्हा परिषद