मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांना अवकाळी पावसाने झोपडले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अश्यातच पुन्हा एकदा एक नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने मोचा चक्रीवादळ तयार होणार असून 5 ते 7 तारखे दरम्यान हे वादळ तयार होऊन ते बांग्लादेश आणि बंगाल आणि ओडीशा किनारपट्टीला धडकणार आहे.
यामुळे काही राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे येत्या दोन दिवसात वायव्य भारतात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दरम्यान, हे वादळ हवेतील आद्रता शोषून घेणार असल्याने राज्याच्या कमाल तापमानात हळू हळू वाढ होणार आहे.
अवकाळी पावसाचे प्रमाण होणार कमी…
देशात अनेक राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यात आता बंगालच्या उपसगारात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मोचा नामक चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे वादळ हवेतील आद्रता शोषून घेणार असल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच अवकळी पावसाचे प्रमाण देखील कमी होणार आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाने माहिती दिली आहे. तसेच आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा देखील अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.
मच्छीमारांना दिला अलर्ट…
दरम्यान ,हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे समुद्रात न उतरण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे.