विकसनशिलतेकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
कर्जत : गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित अशा शेतकरी वर्गाला आत्मनिर्भर, स्वावलंबी बनविण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी वर्गाला बरोबर घेऊन मी शेतकरी या नावाने शेतकऱ्यांचे एक संघटन उभे केले जात आहे.
भाजपा नेते सुनील गोगटे यांच्या संकल्पनेतून आणि रमाकांत जाधव, मंदार मेहंदळे, राजेश भगत या पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे शेतकरी संघटन-ऑर्गेनायझेशन उभे केले जात आहे.
तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी केंद्रशासन-राज्यशासन यांचे माध्यमातून जाहीर होणाऱ्या योजनांचा फायदा या शेतकरी वर्गाला कसा देता येईल. शेतकरी आत्मनिर्भर कसा होईल.
शेती व्यवसायासाठी शेतकरी वर्गाला बी-बियाणे, खते, औजारे यासाठी बॅंकाकडून अनुदान कसे देता येईल, आधुनिक शेती व्यवसायाचे दृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्याला मदत कशी होईल, या सर्व बाबींचा उहापोह-चर्चा करण्यासाठी तीवरे येथील प्रगतीशिल शेतकरी काशिनाथ तिखंडे यांचे कृषी आनंद फार्म येथे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून शेतकरी मेळावा घेण्यात आला होता.
यावेळी केंद्र सरकारच्या शेतीविषयक योजनांचा फायदा घेणेसाठी प्रथम (फार्मर प्रोड्युसर ऑर्गेनायझेशन) असणे ही काळाची गरज असल्याने, कमीत-कमी 300 शेतकरी बांधवांची ऑर्गेनायझेशन तयार करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
या ऑर्गेनायझेशनच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील शेती व्यवसायाला चालना देऊन, तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे किंवा ऑर्गेनायझेशनच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचा माल जागेवरच खरेदी करून घेणे त्यानंतर तो मुख्य मार्केटला नेऊन विकणे आदी बाबींबर चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर भविष्यात ऑर्गेनायझेशनच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, छोट्या-छोट्या व्यवसायांची निर्मिती करण्याकडे ऑर्गेनायझेशनचा भर असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्नातील आत्मनिर्भर शेतकरी ही संकल्पना ही शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्याकडे असल्याने एफपीओसारख्या संस्थाचा कल, शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्रीय योजनांकडे जाणे ही काळाजी गरज असल्याचे सुनील गोगटे यांनी यावेळी सांगितले.
भविष्यात या ऑर्गेनायझेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भावाला रास्त भाव, नव-नवीन योजनांसाठी अनुदान, शेतीविषयक यंत्रसामुग्रीसाठी बॅंकाकडून, वित्तीय संस्थाकडून भरघोस मदत होत राहिल्यास तालुक्यातील शेतकरी प्रगतीशील तर होईलच; परंतु त्याचबरोबर तो सधनहीं होईल. पर्यायी नवीन तरुणवर्गालाही शेती व्यवसायाकडे वळण्याची ओढ लागेल, असे मत यावेळी मांडले गेले.
खांडपे येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजी पाटील यांनी हळद लागवडी करून काढलेले विक्रमी उत्पादन याची यावेळी सर्वांना माहिती दिली.
या वेळी सुनील गोगटे, रमाकांत जाधव, राजेश भगत, संतोष घाडगे, दशरथ मुने, ओमप्रकाश लाहोटी, निलीकेश दळवी, तनुजा गायकर, चंद्रकांत मांडे, पांडुरंग भगत, दर्पण दसानी, बजरंग कांबरे, अनंता ठाकरे, रवींद्र जाधव, संजय लाड, रमेश शिंदे, परेश वाघमारे आदी शेतकरी बांधव-भगिनींनी यावेळी उपस्थित होते.
शेतकरीवर्गाला ऑर्गेनायझेशनची असलेली गरज, शेती व्यवसायातील आलेला अनुभव, पिकविलेल्या मालाला मिळणारा कमी भाव, लेबर समस्या, इतर अडचणी आदी गोष्टींवर मार्गदर्शन केले.