बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तपासणीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढविण्यात येणार असून हजारोंच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करताना आरोग्य सेवकांच्या तात्पुरत्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये जिल्ह्यातील जनतेने या काळात प्रशासनास पूर्ण ताकदीने सहकार्य करणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अतिशय चांगले नियोजन करीत आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलाचेही कार्य कौतुकास्पद असून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून जनतेने नियमांचे काटेकोर पालन करणे काळाची गरज आहे. दहा दिवसात पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळात कोविड-१९ ची साखळी तोडुन कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीतुन कायमचा निरोप देण्याचा आपला मानस आहे, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
तसेच या संकटाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात होणाऱ्या भर्तीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाले.
कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी उत्कृष्ट जेवण आणि स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग लोकांच्या निष्काळजीपणामुळे वाढत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाही केली जाईल. बाहेर गावी जाऊन आलेल्यांसाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था शहरात करण्याऐवजी शहराबाहेरील मंगल कार्यालय किंवा इतर इमारतीत केली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हा लॉकडाऊन जिल्ह्यासाठी शेवटचा असावा असा निर्धार करून कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दपार करू आणि या संकटाचे संधीत रुपांतर करू असे पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. प्रकाश सोळुंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार आदी शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.