श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे- टिळकनगर रस्त्यांच्या कडेला शेती महामंडळाच्या मोकाट क्षेत्रात सकाळच्या वेळी चोरट्यांना केबल जाळताना येथील शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. चोरट्यांनी शेतकऱ्याला दमदाटी करत घटनास्थळावरून पोबारा केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले.
रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात काळकुट धूर निघत होता. एकलहरे येथील शेतकरी रस्त्याने आपल्या शेतात मोटार चालू करण्यासाठी जात असताना ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. शेतकऱ्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता, चोरटे केबल जाळून नष्ट करत त्यामधून कॉपर तार काढून विक्री करण्यासाठी तयार करत होते.
शेतकऱ्यांनी चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी शेतकऱ्याला दमदाटी करत घटनास्थळावरून धूम ठोकली. शेतकऱ्यांनी लगेचच बेलापूर पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी आली. ठिकठिकाणी केबल जाळून त्यामधली तार काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने, घटनेचे मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले गेले आहे. पोलिसांना या जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.
एकलहरे,उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकऱ्यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. या चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. तर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मात्र, कालच्या घटनने येथील शेतकऱ्यानेच चोरीचा तपास लावला आहे. त्यापैकी एक चोर स्थानिक असल्याचे शेतकऱ्याने पोलिसांना सांगितले. या घटनेने एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीला गेलेल्या मोटारी, केबलसह अन्य वस्तूंबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी गस्त वाढवावी
एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरत आहे. येथील शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारत आहेत. यामुळे रात्री सुरूअसलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही.उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. – सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव