संगमनेर, (प्रतिनिधी)- गावातून दिवसभर धूळ मातीचे लोट उडवत भरधाव वेगात धावणारे पोयटा वाहतुकीचे डंपर ग्रामस्थांच्या रोषाचे कारण ठरत आहेत. गावठाण हद्दीतून वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघाताची शक्यता असून, त्यांच्या धुळमातीने सर्व गाव माखले आहे.
अंभोरे मार्गे जोर्वे गावाच्या दिशेने पोयटा या गौणखनिजाची वाहतूक गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. वाहनांच्या मोकळ्या हौद्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात पोयटा भरून धावणारी ही वाहने आपल्या मार्गावर सर्वत्र अत्यंत बारीक धूळ मातीची उधळण करीत धावतात. याचा मोठा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे.
अंभोरे गावातील घरादारापासून, शेतमाल, जनावरांचा चारा, भांडी यावर धुळीचा थर जमतो आहे. यामुळे एरवी सुख शांततेत सुरू असलेला गावगाडा निष्कारण भरडून निघत आहे. याविरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी ही वाहतूक करणारी वाहने अडवली.
त्यांच्याकडे रॉयल्टी व इतर कागदपत्रांची मागणी केली असता, वाहनचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी केलेल्या चौकशीत यात राजकीय वरदहस्त असल्याची बाब पुढे आली. तसेच या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम व पोयटा उत्खनन केल्याची चर्चा सुरू होती. या अवजड वाहनांमुळे या परिसरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले असून, त्यांची दुरवस्था झाली आहे.