पारनेर -तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या पूर्वमशागतीस सुरवात केली आहे. मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होणार असून, करोनामुळे या वर्षीत शेतात कोणते पीक घेऊ, याची शेतकऱ्यांना आता चिंता सतावत आहे. शेतीचे नियोजन कसे व काय करावे, या संदर्भात त्यांच्या गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण आहे. करोनामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडलेली असताना तालुक्यात पावसाळा जोरात आहे. मात्र तरीही बळीराजा कोमात गेला आहे.
मागील तीन महिन्यांपासून करोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेतीशी संबंधित असणाऱ्या जोडधंद्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. कांदा व वाटाणा हे तालुक्यातील शेतकऱ्याला आर्थिक बळकटी मिळवून देणारी पिके आहेत. मात्र या करोना संकट काळामध्ये हे पिके घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे दिसून येत आहे. इतर व्यावसायिकांना करोनाचा फटका बसला, तसा शेतीलाही तो बसला. त्यातच शेतकऱ्यांनी मोठे भांडवल शेतीमध्ये घातले होते.
ते देखील शेतकऱ्याला मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाकडून शेतकऱ्याला मोठ्या पॅकेजची अपेक्षा असताना सरकारने आता तोंडाला पाने पुसली आहेत, अशी भावना त्यांची झाली आहे. यावर्षी सुरुवातीलाच म्हणजे एक जूनला तालुक्यामध्ये सर्वदूर पेरणी युक्त पाऊस झालेला आहे. अद्यापही ठीक ठिकाणी पाऊस पडत आहे. मृग नक्षत्रामध्ये तालुक्यामध्ये पेरणीला सुरुवात होत असते. या वर्षी शेतकरी कोणती पिके घ्यायची, या संभ्रमावस्थेत आहे.
करोनामुळे शेतीचे भवितव्य काय, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. काही ठिकाणी बाजार समित्या सुरू झाल्या असल्या, तरी अद्यापही मालाला उठाव नाही. तसेच आठवडे बाजार सुरळीत होण्यास किती दिवस लागतील, ते स्पष्ट नाही. त्यामुळे भाजीपाला व इतर तरकारी पिके विक्रीसाठी न्यायची कोठे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
तालुक्यामध्ये सुरूवातीच्या काळात पाऊस पडल्यानंतर वाटाण्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कान्हूरपठार, सिद्धेश्ववाडी, पारनेर, पुणेवाडी, सोबलेवाडी हे वाटण्याचे मुख्य आगार समजणारी गावी आहेत. मात्र यावर्षी वाटाणा बियाणे दुपटीने महागले आहेत. तसेच शेतकरी सुद्धा आर्थिक अडचणीत असल्यामुळे व वाटाणा पिकवल्यानंतर तो विकला जाईल का आणि बाजार भाव कसे राहतील, याबाबतही सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये साशंकता आहे.
त्यामुळे वाटाण्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूग, बाजरी, वाल, तूर अशा पिकांवर शेतकरी सध्या भर देऊ शकतात. कारण हा शेतमाल पिकवल्यानंतर काही दिवस साठवून ठेवता येऊ शकतो. तसेच योग्य किंमत आल्यावर त्याची विक्री केली जाऊ शकते. त्यामुळे खर्चिक पिके घेण्याचे तो टाळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी गुलब्या कांद्याचे तालुक्यातील शेतकऱ्याचे चांगले पैसे झाले. मात्र यावर्षी कांद्यालाही बाजार नाही. त्यामुळे या पिकाकडेही ते पाठ फिरविण्याची शक्यता असल्याचे दिसते.
20 ते 30 टक्के रोपांची मागणी कमी
तालुक्यातील नर्सरी व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 20 ते 30 टक्के भाजीपाला रोपांची मागणी यावर्षी कमी झाली आहे. करोनामुळे शेतकऱ्याला शेतातच शेतमालाचे लाखोंचे नुकसान झाल्याचे पाहावे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे रोपवाटिका व्यवसाय अडचणीत आला आहे.