ओढ्या-नाल्यांना पाणी सोडण्याची मागणी
केडगाव- सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही दौंड तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर मात करण्यासाठी तालुक्यातील ओढे, नाल्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गणेशोतत्सवात हमखास दाखल होणारा वरुणराजा गौरीच्या आगमनानंतर देखील गायब आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे बाजरी आणि ज्वारीच्या पेरण्या झाल्या नाहीत. तसेच नवीन ऊस लागनी रखडलेल्या आहेत. खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे आशेचा किरण शेतकरी बांधवांना दिसत आहे. सध्या मुळा-मुठा आणि भीमा नदीत किनाऱ्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांची गरज पूर्ण होईल एवढे पाणी वाहत आहे. खडकवासला धरणसाखळीतून पुन्हा नदीपात्रात 22 हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावर असणाऱ्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रात सोडण्यात आलेले जादा पाणी दौंड तालुक्यातील वितरिका नाले आणि ओढे यांना सोडण्यात यावे, अशी मागणी सध्या जोर धरीत आहे. त्यामुळे पाऊस लांबल्याची झळ शेतकऱ्यांना बसणार नाही. नदीपात्रातील काही पाणी कालवे वितरिका, ओढे-नाले यांना सोडल्यास शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिका यांची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. शिवाय नदीपात्रातील पुराची तीव्रता काही अंशी कमी होईल.