अलवार (राजस्थान) – राजस्थानातील अलवार येथे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. अलवारमधील हरसोरा गावतून टिकैत यांचा ताफा बनसूर येथे जात असताना हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर टिकैत यांनी ट्विटरचा आधार घेत, भाजपाच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला. हा लोकशाहीचा मृत्यू आहे, असा संदेश दिला.
हरसोरा येथील सभा आटोपून टिकैत हे बनसूर येथे जात होते त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनात टिकैत हे महत्वाचे नेते आहेत.
तत्पुर्वी, झालेल्या सभेत टिकैत म्हणाले, कृषी कायदे पुर्णत: मागे घेईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहील 26 जानेवारीला शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या खटल्यांचा दाखला देत ते म्हणाले, शेतकरी खटल्यांना घाबरत नाहीत. सरकार हे कायदे रद्द करून किमान हमी भावाची कायदेशीर हमी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.
सरकारला असे वाटत आहेत, उन्हाळ्यात शेतकरी घरी निघून जातील. त्यामुळे हे सरकार वेळकाढूपणा करत आहे. पण, आम्ही कोठेही जाणार नाही. नोव्हेंबर डिसेंबर उजाडला तरी आंदोलन सुरूच राहील. त्यांना आधी वाटत होते हिवाळ्यात आंदोलन मागे घेतले जाईल, पण तसे घडले नाही. आताही आम्ही पंखे वगैरे सोयी तेथे बसवल्या आहेत, असे ते म्हणाले.