राहू – दौंड तालुक्यात काही विघ्नसंतोषी, समाजकंटकांकडून महावितरणविरोधात आणि महाविकास आघाडीविरोधात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. यात शेतकऱ्यांची होरपळ होत आहे. सोशल मीडियावर वीजबिल माफीचा संदेश व्हायरल करीत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे फेक न्यूज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दौंड तालुक्यात वीज तोडणीची मोहित तीव्र केली आहे. शेतकऱ्यांनी वीजबिलांसाठी हप्ते पाडून दिले आहेत. सध्या तालुक्यात महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी जनजागृती केली जात आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी, समाजकंटकांनी राज्य शासनाने वीजबिल माफीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. थकीत वीज बिलापोटी वीज तोडली जात आहे. त्यामुळे शेतकरी हफ्ता, चालू बिल, बिल कमी करून कृषीपंपाची वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात हा खोडा घातला जात आहे.
महावितरणकडून ठोस कारवाई गरजेची
राज्य शासनाने वीज बिल माफी केल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गोची झाली आहे. या वृत्ताचा काही शेतकऱ्यांनी शोध घेतला असता हा संदेश फेक असल्याचे आले. हा संदेश जुना असल्याचे काही जण सांगत आहेत. विशेष म्हणजे हा संदेश सोशल मीडियावर ऑनलाइन न्यूजने येत आहे. हा संदेश ओपन करण्यासाठी लॉगिन करत गेल्यास शेवटी काहीच दिसत नाही. कोणीतरी शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याचे यातून सिद्ध होते. या संदर्भात महावितरणकडून समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.