पूर्वीच्या काळी बारा बलुते पध्दतीनुसार देवाण-घेवाणीचे व्यवहार चालत होते. जो जे काम करील, जो व्यवसाय करील त्यानुसार त्याची जात ठरली. आणि त्याच धर्तीवर संबंधित बलुतेदार व्यवसाय करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. ग्रामीण भागात शेतीसाठी लागणारी अवजारे पुरवण्याचे बलुतेदारापैकीच एक घटक म्हणजे लोहार व घिसाडी कारागीर करत होते.
मात्र, कालांतराने शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचे कारखाने उभे राहिले. या कारखान्यातून आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. कारखान्यात तयार झालेली अवजारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचू लागली आहेत.
त्यामुळे पारंपारिक पध्दतीने तसेच जुन्या तंत्रज्ञानाच्या जोरावर काम करणारे लोहार व घिसाडी कारागीरांच्या व्यवयासायावर गंडातर आले आहे. कारखान्यात तयार झालेली अवजारे घेण्याची ज्या शेतकऱ्यांची आर्थिक ताकद नाही, असे शेतकरी आजही लोहार कारागीरांकडूनच अवजारे तयार करून घेताना दिसतात.
शेताची मेहनत करून घेत असताना शेतकरी वापरत असलेल्या कुळवाचे पास, लाकडी बैलगाडीच्या धावा, विळा, खूरपे, कुऱ्हाड, कोयता आदी शेतीशी संबंधित वस्तू बनविणे त्यांना धार लावणे तसेच मजूर लोकांना लागणारी खोरी, पार, टिकाव, कुदळ आदी साहित्य शेवटणे. याशिवाय घरी वापरात येणारी काटवट, रवी, उलथणे, पळ्या, पक्कड आदी वस्तूचेही उत्पादन ही बारा बलुतेदार कारागीर करत होते.
या सर्व अवजारांसह संसार उपयोगी साहित्याचेही आता उत्पादन कारखान्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने लोकांनी पारंपारिक बलुतेदारांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे “ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ हे गाणं ज्यांच्यावर रचलं गेलं तो लोहार समाज मात्र, अंधाराच्या खाईत लोटला गेला आहे. शासन दरबारीही या समाजाच्या उन्नतीसाठी तरतूद नसल्याने आजही उपेक्षित जीवन जगण्याची वेळ आली आहे.
जो जे काम करील, जो व्यवसाय करील त्यावरून त्याची जात ठरल्याचे जुनी जानती लोक सांगतात. त्यातूनच बारा बलुतेदारांची निर्मिती झाली. या बारा बलुतेदारांचा पहिला थेट संबंध शेतकऱ्यांशी आला आणि नंतर समाजातील इतर घटकांशी. शेतकरी व बारा बलुतेदार हे एकमेकांवर अवलंबून असायाचे.
शेतीला लागणाऱ्या वस्तू या बलुतेदारांकडून घ्यायचा अन् त्या बदल्यात त्याच्या झोळीत मुक्त हाताने धान्य टाकायचा. आज काळ बदलला अन् काळानूरूप शेतकरीही बदलला. बारा बलुतेदारांपैकी ज्यांनी काळाची पावले ओळखूून नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून व्यवसायात बदल केले ते पुढे गेले आणि ज्यांनी बदल स्विकारला नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यापैकीच एक लोहार समाज. – आनंदराव देसाई
आता आमच्या हाती केवळ जुन्या अवजारांची दूरूस्ती, धार लावणे, शेवटणे एवढेच काम राहिली आहेत. त्यामूळे आम्हा लोहार कारागीरांची परवड वाढली आहे. आमचे जीवन सध्या पूरते मेटाकूटीस आले असून ऐरणीचे घाव आता थेट आमच्या आयुष्यावर बसत आहेत. मायबाप शासनाने आमच्या पारंपारिक उद्योगाबाबत उदासीनतेचे धोरण न अवलंबता आम्हा कारांगींरासाठी ठोस उपाय योजना करावी.
विठ्ठल लोहार, डेरवण