माणसाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर त्याच्या अंगी काही गुण असावे लागतात. अशा या गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजेच संयम. संयम म्हणजेच सहनशीलता, सबुरी किंवा धीर धरणे. आयुष्यात अनेक आव्हाने सातत्याने येत असतात या आव्हानांवर मात करण्यासाठी व्यक्तीमध्ये सहनशीलताही असायलाच हवी. यश हे आपल्या प्रयत्नावर जेवढे अवलंबून असते तेवढेच आपल्या मधल्या संयमावर अवलंबून असते.
आपापल्या आयुष्यात प्रत्येकाचे काही ना काही ध्येय ठरलेले असते आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. परंतु अनेकदा या प्रयत्नांतून अपेक्षित उद्दिष्ट साध्य होण्यास बराच विलंब होत असतो. प्रयत्नात येणाऱ्या अडथळ्यांनी किंवा होणाऱ्या विलंबाने आपण नाउमेद होतो. यानंतर शक्यतो प्रयत्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न होतो आणि मग इतर कोणीतरी आपल्या कष्टाला,प्रयत्नाला त्याच्या बुद्धीची जोड देऊन यश मिळवतो. आपण मात्र याबद्दल केवळ खंत व्यक्त करीत बसतो.
धैर्य, संयम याबद्दल एक माकडाची गोष्ट आहे.
एका गावाजवळील जंगलात एक माकडांची टोळी असते. जे उन्हाळ्यात अन्नाच्या शोधात गावात येतात. गावात येताच त्यांना एका शेतात एक आंब्याचे झाड दिसते. ज्या झाडाला आंब्याची भरपूर फळे लागलेली असतात. माकडे खूश होतात आणि त्या झाडावर आंबे खाण्यासाठी झडप घालतात. मात्र काही वेळाने तिथे शेतकरी येतात आणि त्या माकडांना हुसकावून लावतात. आता मात्र माकडे निराश होऊन पुन्हा जंगलाकडे जातात. जंगलात गेल्यावर माकडांच्या टोळीचा प्रमुख माकडांना म्हणतो, “आता आपण सारेजण आपल्या जंगलातसुद्धा आंब्याची झाडे लावूया.’ यासाठी तो आंब्याची कोय प्रत्येकाच्या हाती देतो आणि प्रत्येकाला ती कोय मातीत लावण्यासाठी सांगतो. माकडे आनंदाने मातीत छोटे छोटे खड्डे करून आंब्याची कोय लावतात. दुसऱ्या दिवशी सकाळी न राहवून त्या कोयीला कोंब फुटला की नाही हे पाहण्यासाठी मातीतून ती कोय उकरून काढतात. परंतु त्या कोयीला साधा एक कोंबही फुटलेला नसतो. ती माकडे दर दिवशी पुन्हा पुन्हा माती उकरून कोय काढतात. काही दिवसांतच आंब्याची कोय वाळून जाते. माकडांचे आंब्याच्या झाडाचे स्वप्न हे स्वप्नच बनून राहते. कदाचित काही दिवस धीर धरला असता तर नक्कीच आंब्याची रोपे बहरली असती.
माणसांचीही अवस्था या माकडांपेक्षा फारशी वेगळी नसते. कोणतीही गोष्ट त्यांना लगेच हवी असते.
झटपट यश मिळविण्याचे भूत जणू त्यांच्या मानगुटीवर बसलेले असते. त्यामुळे अपेक्षित प्रगती करण्यात त्यांना यश मिळत नाही. मात्र काही व्यक्तिमत्त्वे याला अपवादही असतात. जगातील बहुसंख्य यशस्वी लोकांच्या अंगी सहनशीलता हा गुण विशेषत्वाने आढळतो. यावरच कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक व प्रख्यात मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी 1972 ला एक सिद्धांत मांडला. ज्यात त्यांनी वर्गातील सर्व मुलांना काही चॉकलेट्स दिले. परंतु चॉकलेट्स खाण्यापूर्वी त्यांनी मुलांपुढे एक विचित्र अट ठेवली. “मी प्राचार्यांच्या दालनात जाऊन दहा मिनिटांत त्यांना भेटून परत येईपर्यंत कोणीही चॉकलेट्स खायचे नाहीत.’ असे त्यांनी विद्यार्थ्यांना बजावले.
दहा मिनिटांनी ते वर्गात परतले. त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की, वर्गात एकूण संख्येच्या केवळ सात मुले अशी होती के ज्यांच्या हातात चॉकलेट्स जसेच्या तसे होते. इतरांनी मात्र कसलाही विचार न करता चॉकलेट्सचा फडशा पाडला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांनी त्या सात मुलांबद्दल जाणून घेतले. त्यावेळेस त्यातून असा निष्कर्ष निघाला की, ज्या सात मुलांनी ते चॉकलेट्स तसेच ठेवले होते ती मुले इतर मुलांच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरली होती. पुढे त्यांचा हा मानसशास्त्रीय सिद्धांत मार्श मेलो थेअरी नावाने प्रसिद्ध झाला. या सिद्धांताबाबत त्यांनी त्यावेळी एक विधान केले. ते विधान होते, जो माणूस दहा मिनिटे धीर धरू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही.
धैर्य, सहनशीलता ही मानवी व्यक्तिमत्त्वातील एक गुणवत्ता आहे. जी गुणवत्ता माणसाचे आत्मबल वाढवीत असते. ही गुणवत्ता असणारा माणूस कठीण परिस्थितीलाही शरण आणतो आणि आपल्या विलक्षण इच्छाशक्तीने नावलौकिक मिळवितो. असे म्हणतात “सब्र का फल हमेशा मीठा होता है.’ चला तर मग कोणत्याही कार्यासाठी, ध्येयासाठी जरा कळ सोसूया. धैर्य, संयम,सहनशीलता किंवा धीर यापैकी कोणत्याही अर्थाने का होईना पण थोडे थांबूया. वाट पाहूया…मग बघा, यश उशिरा मिळेल, पण हमखास मिळेल.
व्यक्तिमत्त्व
सागर ननावरे