जुन्नर, (वार्ताहर) – राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणार्या अडचणीबाबत केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्यभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद-सूर्य आहे तो पर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यात निमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी करणे शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणकरीता प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून, त्यामधील पुरुषत्व जागृत केले. मुगलासारख्या बलाढ्य शत्रूचा नित्पाद केला. शिवरायांनी अन्यायाच्याविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.