मुंबई – गत काही महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी बुधवारी विधिमंडळात या अपघातांवर तोडगा निघेपर्यंत हा महामार्ग बंद ठेवण्याची आग्रही मागणी केली. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. पण त्यांचे हे स्वप्न आता जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे हा महामार्ग अपघातांवर तोडगा निघेपर्यंत बंद ठेवला जावा, असे मत विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
समृद्धी महामार्गाचे ऑडिट, त्यावरील सोयीसुविधा, आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी तथा क्रेन कोसळून झालेल्या अपघातामुळे मजुरांचे मृत्यू यावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, हा विषय अगदी ताजी घटना आहे. या दुर्घटनेत 20 जणांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे हा समृद्धी जिवघेणा झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या 90 टक्के ट्रॅव्हल्सनी मार्ग बदलला असून फक्त 10 टक्के ट्रॅव्हल्स आता या मार्गावरून जात आहेत.
सरकारला आम्ही सूचना देत आहोत की हा महामार्ग काही काळासाठी बंद करून त्यावर ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, त्या केल्या पाहिजेत. म्हणजे राज्याच्या विकासात भर घालणाऱ्या या रस्त्याचे फडणवीसांचे स्वप्न आता जीवघेणे स्वप्न झालेले आहे.
यावर तुम्ही उपाय करेपर्यंत मार्ग बंद ठेवा. या रस्त्यावर दर 150 ते 200 किमीवर फूड प्लाझा, रुग्णवाहिका, क्युआरव्ही या सगळ्यांची व्यवस्था झाल्यावर तो पुन्हा सुरू करा, अशी सूचना वडेट्टीवर यांनी केली.