मुंबई – परमबीर सिंह यांनी पाठविलेल्या पत्रानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. आजही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. फडणवीसांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर पांघरुण घातल्याचा आरोप केला आहे. यावर काँग्रेसनी प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले कि, मूळ मुद्दा होता अँटिलियाच्या बाहेर स्फोटके सापडणे, मनसुख हिरेनची हत्या. पण फडणवीस आता त्याबद्दल काही बोलत नाहीत व गोलपोस्ट बदलत आहेत. हे सगळे सत्तेची हाव असल्यामुळे ते करत आहेत. काहीही करून पुन्हा सत्तेत येण्यासाठी आरोप केले जात आहेत.
तसेच, आता फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत. यात केंद्राचा काय संबंध? हे सगळं दबावाचं राजकारण केलं जात आहे, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.
पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा ६.३ जीबी इतका डेटा माझ्या हाताला लागलेला आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस सांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला. यावर बोलताना सचिन सावंत म्हणाले, कॉल इंटरसेप्शन करणं कायदेशीर नाही, त्यामुळे जे काही झालं ते कायदेशीर होतं का? त्या अहवालात नक्की काही कारवाई करण्यासारखं आहे का उगाचच आरोप हो आहेत? हे सगळं बघावं लागेल, असे त्यांनी सांगितले.