नगर – भारत देश ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. ही व्यवस्था टिकवण्याचे आणि बळकट करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच, लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्व असाधारण आहे. प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांची मतदारनोंदणी करुन घेणे आणि निवडणूकीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने हे महत्व अधोरेखीत केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दहाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन आज,दि.25 येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर श्री. द्विवेदी यांच्या हस्ते नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मतदानाचे महत्व पटविण्याबाबतची प्रतिज्ञा देण्यात आली.
परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी (श्रीगोंदा-पारनेर) सुधाकर भोसले, उपजिल्हाधिकारी रोहिणी नर्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार उमेश पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काटमोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री.नकासकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
सुरुवातीला मतदार जागृती रॅलीस सकाळी जिल्हा क्रीडा संकुल (वाडिया पार्क मैदान) येथून सुरुवात झाली. मोठ्या संख्येने व्द्यिार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली टिळक रोडमार्गे आयुर्वेद महाविद्यालय चौक, जुनी महानगरपालिका इमारत, पंचपीर चावडी, माळीवाडा वेस, महात्मा गांधी पुतळामार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येऊन तेथे या रॅलीचा समारोप झाला.
त्यानंतर श्री. द्विवेदी आणि मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नवमतदार आणि दिव्यांग मतदारांना निवडणूक ओळखपत्राचे (ईपीक कार्ड) वितरण करण्यात आले. उपस्थितांना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी मतदान हक्क बजावण्याबाबत आणि लोकशाही बळकटीकरणाबाबतची प्रतिज्ञा दिली.
राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगांच्या शंभर मीटर धावण्याची स्पर्धाही यावेळी घेण्यात आली.शहरातील मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील शाळांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मतदार जागृतीसंदर्भात सादर झालेले पथनाट्य, दिव्यांग विद्यार्थ्यांचे नृत्य आणि सांस्कृतिक गीतांनी या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
अन् क्षणात परिसर झाला स्वच्छ…
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनजागृती रॅलीनंतर विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि बिस्कीटस वाटप करण्यात आले. काहींनी ते खाल्ल्यानंतर कागद आणि पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तिथेच टाकल्या. हे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण स्वच्छ भारत अभियान राबवत आहोत. आपल्या शहरातही ते अभियान सुरु आहे, असे सांगितले. अन् काय आश्चर्य… विद्यार्थी आणि शिक्षक तसेच उपस्थितही लगेच परिसर स्वच्छतेसाठी कामाला लागले. बघताबघता काही क्षणातच हा क्रीडा संकुलातील कार्यक्रमाचा परिसर स्वच्छ झाला.