आंबेगाव पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
लोणी धामणी-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना परतीच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. गेली पाच-सहा दिवसांपासून या भागात शासनामार्फत शेताच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत; मात्र व कमी दिवसांत नुकसानग्रस्त क्षेत्रात पाहणी करताना शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. परिणामी काही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पंचनामा कागदपत्रे पूर्ततेसाठी काही दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
आतापर्यंत पंचनाम्यांचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. पीक विम्यासाठी सात बारा, आधार कार्ड, फोटो, बॅंक खाते पुस्तक झेरॉक्स इ. कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडताना दिसून येत आहे. काही ठिकाणी इंटरनेटच्या अडथळ्यामुळे सातबारा उतारे वेळेत मिळत नाहीत. लोणी (ता. आंबेगाव) येथे परतीच्या जोरदार व मुसळधार पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. गेली महिनाभर सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात साचल्याने सडून जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी जोरदार मागणी केली होती. त्यानुसार ग्रामसेविका सोनाली जाधव, सरपंच ऊर्मिला धुमाळ, आंबेगाव तालुका खादी ग्रामोद्योगचे संचालक अमित वाळुंज आदींनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे केले आहेत. यावेळी उपसरपंच सुरेखा सतीश थोरात, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकवाड, माधुरी गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव, बाळासाहेब गायकवाड, कैलास गायकवाड, नितीन आढाव व शेतकरी उपस्थित होते
- आंबेगाव पूर्व भागातील काही गावांना पाण्याअभावी वर्षभर पाण्याचा टॅंकर सुरु होता. दोन महिन्यापूर्वी पाण्याचा टॅंकर बंद करण्यात आला; परंतु परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी.
-संजय थोरात, तालुका अध्यक्ष भाजप