राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विद्यापीठास निवेदन
पुणे : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा फटका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार असून अतिवृष्टी झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू एन.एस उमराणी यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. सोमनाथ लोहार, रूषी जगदाळे, बाबासाहेब नलावडे, ऍड. राजू पवार यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने प्रचंड थैमान घातले आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. समाजातील प्रत्येक घटक या अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आहे इतकेच नव्हे तर शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे.
विद्यार्थी देखील संकटाला तोंड देत आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या वर्षीचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या शिवाय, बसपास मोफत द्यावेत. शहराच्या ठिकाणी निशुल्क खानावळीची व्यवस्था करण्यात यावी. महाविद्यालयातर्फे कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येणार नाही यासाठीच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात याव्या. विद्यापीठातील वसतिगृहाचे शुल्क माफ करण्यात यावे, अशा मागण्यही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.