नवी दिल्ली – मे महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजमध्ये लघुउद्योगांना तीन लाख कोटी रुपये कर्ज देण्याची योजना जाहीर केली होती. या कर्जाला केंद्र सरकारने शंभर टक्के हमी दिली होती. आता या योजनेला एक महिना म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अर्थमंत्रालयाने याबाबत सांगितले की, तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज लघुउद्योगांनी घ्यावे अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे या योजनेला या कर्जाची पूर्तता होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जर 30 नोव्हेंबरपर्यंत तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले नाही तर या योजनेला आणखी मुदतवाढ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लघु उद्योगांना मदत होणार आहे.