मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर त्यांच्या सहकाऱ्यांसह गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी या दौऱ्यावरून विरोधकांना लक्ष्य केले आहे. राज्यकर्त्यांच्या मनात फक्त एकच आहे. कधी रामाच्या नावाने, कधी आणखी कुणाच्या नावाने, कधी अयोध्येच्या नावाने राजकारण केलं जातं आहे. जनतेचे मूळ प्रश्न वगळून, धर्म, जात यावर आधारित एक वेगळं सामाजिक चित्र निर्माण करणे आणि कष्टकरी बांधव मूलभूत प्रश्न यापासून बाजूला कसा राहील, याची काळजी घेतली जात आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे.
नाशिक येथे हिंद मजदूर सभा या राष्ट्रीय कामगार संघटनेला 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
ते यावेळी म्हणाले की, आज देशात महागाई, बेरोजगारी, नोकरी यांचा प्रश्न आहे. या प्रश्नांसाठी सत्ता वापरली पाहिजे, याची अपेक्षा राज्यकर्त्यांकडून आहे. मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता वापरावी, मात्र यासाठी राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचे शरद पवार म्हणाले.
आज अनेक ठिकाणी सरकारी कामे बंद होत आहे. तुम्ही तुमचे काही प्रश्न सोडवून घेण्यासाठी यशस्वी झाले. या संघटनेने सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवण्यासाठी खबरदारी घेतली. आपली एकी अभेद्य ठेवली पाहिजे. आपली शक्ती मजबूत करायला हवी. कारण आज धर्म आणि जाती यांच्यात फूट पडत आहे. त्याचबरोबर देशात महागाई, बेकारी, नोकरी यांचा प्रश्न आहे. याच्यासाठी सत्ता वापरली पाहिजे, याची अपेक्षा राज्यकर्त्यांकडून असल्याचे ते म्हणाले.