मांडवगण फराटा – मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये पती-पत्नी आणि बहीण यांच्यात झालेल्या वादामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव यांच्यात बुधवारी (दि. 17) रात्री वाद झाल्याने बहीण माया सातव यांनी टोकाचे पाऊल उचलत घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याची माहिती भाऊ समीर याला कळताच समीर आणि पत्नी वैशाली यांच्यात सकाळी वाद झाल्यानंतर या वादातून समीर याने वैशाली हिच्यावर कुऱ्हाडीने वार करीत पत्नीलाही संपवले. त्यानंतर स्वतः समीर याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वैशाली तावरे आणि माया सातव यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पोलीस तपासानंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होणार असून या दुर्दैवी घटनेने मांडवगण फराटा परिसरात शोककळा पसरली आहे. शिरुर पोलीस तपास करीत आहेत.