सातारा: काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान या नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली पण शरद पवार आमच्यासाठी आदरणीय आहेत. ते आमच्या हृदयात आहेत, असे वक्तव्य केले होते. यावर शरद पवार यांनी चांगलाच चिमटा घेतला आहे.
शरद पवार म्हणाले, तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही. शरद पवार हृदयात आहेत बोलणाऱ्यांचे हृदय तपासा. पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले.
शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. मला उमेदवारांची चिंता नाही. ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल.
भाजपमध्ये जाणार नाही असं शिवेंद्रराजेंनीच मला सांगितलं होतं. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा करू असं आमचं ठरलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष सोडताना कामं होत नसल्याची कारणं दिली आहेत. ते एक बरंच झालं. सत्ताधारी सुडबुद्धीनं वागताहेत आणि विरोधक त्यांना तोंड देऊ शकत नाहीत, असा निष्कर्ष यातून निघतो.
साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. मात्र, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय ते असं काही करणार नाहीत. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. मात्र, त्यांची नाळ मतदारांशी असल्यानं चिंता करण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले.