प्रतिपुर्ती करून थेट बॅंक खात्यात रक्कम जमा होणार
मुंबई (प्रतिनिधी) – दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करताना यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. ही प्रतिपूर्ती आरटीजीएसमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या फीच्या प्रतीपुर्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना अशी बाब निदर्शनास आली की, दुष्काळी भागातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना परीक्षा फी माफ केली जाते. मात्र त्यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जाते. त्याच वेळी त्यांनी हे शुल्क सुद्धा माफ करून पूर्ण फीची प्रतिपूर्ती करण्यात येईल, असे सभागृहात जाहीर केले होते. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे सर्व आमदारांनी स्वागत केले होते.
त्यानुसार तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शाळा प्रस्ताव तयार करुन शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवला जात असे. मग शिक्षण अधिकारी व शिक्षण विभाग त्याला मंजुरी देऊन शाळेला हा निधी उपलब्ध करुन दिला जात असे. मग फी विद्यार्थ्यांना परत मिळत असे. यामध्ये अनेक वेळा दप्तर दिरंगाई ही होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता प्रतिपुर्तीच्या कार्य पध्दतीमधे सुधारणा करुन थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या खात्यात फीची प्रतिपुर्ती करण्यात येणार आहे.