बहुतेक सर्व विवाहांमध्ये तडजोड तर करावीच लागते. कितीतरीजणांचे वैवाहिक जीवन वरवर कितीही सुखाचे दिसले, “एव्हरीथिंग इज फाइन’ असे वाटले तरी प्रत्यक्षात काही ना काही असमाधान असतेच. विशेषतः भारतातील बहुतेक सर्व विवाह हे स्त्रियांच्या त्यागावर आणि तडजोडीवर निभावून जातात. अशाच एका वरवर सुखी दिसणाऱ्या वैवाहिक जीवनाची कहाणी या शॉर्टफिल्ममध्ये आहे.
एक मध्यमवयीन जोडपे रेल्वेचा मोठा प्रवास करून आले आहे. हातात मोठ्या, जड पिशव्या सांभाळत जिने चढून ते वर येतात. त्यांची तरुण मुलगी दार उघडते. पिशव्यांमध्ये मुलीच्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी आईने प्रेमाने आणलेल्या असतात. ती एकेक तिला उत्साहानं दाखवू लागते. मुलगी हरखून पाहू लागते. तेवढ्यात मुलीचे बाबा सिगारेट पेटवत तिच्या आईला म्हणतात, “ते जे काय आणलं असेल ते नंतर दाखवत बसा. आधी चहा तर कर. आंबून गेलंय शरीर प्रवासाने.’ आईही दमलेलीच असते. पण ती उठून चहाच्या तयारीला लागते.
मुलगीही तिच्याबरोबर आत येते. म्हणते, “तुला माहीत नसेल कुठं काय ठेवलंय. दाखवते तुला.’ आई घर बघते आणि म्हणते, “चांगलं घरंय तुझं.’ मुलगी म्हणते, “माझ्या पगारात जसं बसलं तसं घेतलंय.’ “आमच्या घरापेक्षा तर चांगलंच आहे.’ “… पण आई, तू सुट्टी म्हणून माझ्याकडे येणार होतीस. आपण दोघींनीच ही सुट्टी एन्जॉय करायची, असं ठरलं होतं ना?’ आई काही फार बोलत नाही. म्हणते, “त्यांना वाटलं, मला एकटीला जमणार नाही.’ एकंदर रागरंग पाहून आपल्या लक्षात येतं की, बायकोसाठी ते आलेले नसून त्यांनाच मजा करायचीय, म्हणून ते आलेत. तिच्याशिवाय त्यांची सेवा कोण करणार..! त्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला ते फोन करतात. मुलगी म्हणते, “बाबा, तुम्ही सुट्टी काढून दिल्ली बघायला, फिरायला आलायत ना? आम्हाला बोटिंग करायचंय. शॉपिंग करायचंय. आता इथेपण कशाला नातेवाईक वगैरे…’ पण तिचे बाबा अर्थातच ऐकत नाहीत.
रात्री मुलगी शेजारी बघते तर आई बेडवर नसते. ती शोधत गच्चीवर जाते. तिथे तिला रडताना पाहून मुलगी विचारते. आधी आई काही बोलत नाही. शेवटी एकदम म्हणते, “मला आता परत घरी नाही जायचं. मी त्यांच्याबरोबर नाही राहू शकणार. सगळी जिंदगी अशीच घालवली मी. मी इथेच तुझ्याकडे राहिले तर चालेल का?’ मुलगी चकित होते. आईची समजूत घालते. प्रत्येक घरात काही ना काही कुरबुरी असतातच. म्हणून काय कोणी नवऱ्याला सोडून राहते का; वगैरे बोलते. मग आईही पुन्हा सावरते. म्हणते, “हं, मी असंच बोलले. बरोबर आहे तुझं.’ वरवर हे बोलणं साधं वाटतं. पण विचार केला तर लक्षात येतं की, स्वतंत्रपणे घर घेऊन मनासारखी एकटी जगणारी मुलगी आईकडून मात्र जुळवून घेण्याची अपेक्षा करते.
नणंदेकडे जाताजाता वाटेत आईला वेगळ्या प्रकारच्या चपला दिसतात. तिला आवडतात. चौकशी करीत असतानाच नवरा खेकसतो, “नंतर घेऊ आता ते. तिकडे उशीर झालाय.’ त्या दोघी मुकाट्यानं निघतात. मुलीच्या आत्याकडे पोचतात. ती आग्रहानं त्यांना तिथंच ठेवून घेते. नवरा गच्चीवर एकीकडे क्रिकेट खेळतोय. एकीकडे तोंडात काहीतरी खायचे टाकतोय. चेष्टा करत बायकोला म्हणतो, “तुला काय करायचंय शिक्षण? काय प्रबंध लिहिणारंयस? की सही करून कुणाला चेक द्यायचाय?’ आई काहीच बोलत नाही. ओशाळवाणं हसते फक्त.
आईला काय खटकतेय हे हळूहळू मुलीच्या लक्षात येऊ लागते. ती म्हणते, “आईला आज बोटिंग करायचेय.’ लगेच तिचे बाबा म्हणतात, “बोटिंगचं काय एवढं? बघू कधीतरी पुन्हा…’ दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर बाबांना चहा मिळत नाही. तेव्हा ते मुलीला म्हणतात, “ती बाथरुममध्ये असणार. मला चहा करून दे जरा.’ ती आईला शोधते तर ती घरात दिसत नाही. बाबा म्हणतात, “जातेय कुठे? नीट बघ… घरातच असणार.’ ही फिल्म मानसी निर्मल जैन यांची आहे. साध्यासाध्या संवादातून त्यांनी या फिल्ममधल्या व्यक्तिरेखांमध्ये रंग भरले आहेत. बायको बाहेरही कुठे गेली असेल अशी नवऱ्याला शंकादेखील येत नाही. त्याला खात्रीच आहे, आपल्याला विचारल्याशिवाय बायको जाणार कुठे?
आपल्याला दिसतं की, ही आई तिला आवडलेल्या चपलांच्या दुकानातून चपला घेते आहे. सीमा पहावा या ज्येष्ठ अभिनेत्रीनं या फिल्ममधली ही घरगुती वळणाची गृहिणी हुबेहूब उभी केली आहे. मग ती अशीच थोडी फिरतफिरत बागेत येऊन बसते. छान वारा सुटलेला असतो. तिचा चेहरा प्रसन्न. तिला काय हवं होतं खरं तर? एक फक्त थोडा मोकळेपणा. स्वतःच्या मनानी थोडं हिंडणंफिरणं, काही आवडीची गोष्ट करणं… पण कुणालाच त्याचं महत्त्व वाटत नाही. मुलीचा फोन वाजतो. फोनवर तिची आई म्हणते, “माझ्याबरोबर तू राहणार नसलीस तरी आत्तापुरती कंपनी तरी दे.’ ती कुठून बोलतेय ते विचारून मुलगी तिला गाठते. दोघी बोटीत बसतात. स्वच्छ, निर्मळ पाणी आणि त्यात ह्यांची बोट चाललेली. आई आनंदात. मुलगी काय ते समजते. म्हणते, “आई, तू माझ्याबरोबर राहायला आलीस तरी चालेल.’ आईचे लक्ष नाही. ती आपल्याच नादात रमलेली. इथेच ही फिल्म संपते. काही न सांगतादेखील खूप काही सांगून.
माधुरी तळवलकर