मुंबई, – “सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी’ ही वस्तुस्थिती एकंदर संपूर्ण जगभरातच दिसून येत आहे. यामुळे देश असो की विदेश महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची तितकीच गरज असल्याचे परखड मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने आयोजित “ब्रेक द बायस’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, भारताच्या अतिरिक्त अधिवक्ता ऐश्वर्या भाटी, आंतरराष्ट्रीय वकील करुणा नंदी, ऍड. गीता लुथरा, ऍड. तन्वी दुबे उपस्थित होते.
ऍड. ठाकूर म्हणाल्या, देश किंवा विदेशात एक स्त्री म्हणून प्रत्येकीला नेहमीच संघर्ष करावा लागला आणि आजही लागतो. सर्वच स्तरावर अडचणी या वेगवेगळ्या आहेत. आज अर्थंसंकल्पात जेंडर बजेटवर सातत्याने भर देण्यात येतो. मात्र महिलांना त्यातून खरा न्याय देण्याचं काम महिला धोरणाच्या माध्यमातून होते, महिला धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात असून महिलांसोबत LGBTQIA+ समुदायाचा सहभाग यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच धोरणाची अंमलबजावणी फार महत्वाची आहे. त्यामुळे एकंदर सर्वच पातळीवर या धोरणाचा विचार करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.
महिला तसेच LGBTQIA+ साठी असलेले हे धोरण म्हणजे पुरुषांचा विरोध असं याचं चित्र नाही. पूर्वी स्त्री-पुरुष एकाच रथाची दोन चाकं मानली जातात. ही गाडी सुरळीत चालावी म्हणून पुरुषांचा या प्रक्रियेतील सहभाग ही महत्त्वाचा आहे. कारण अजूनही स्त्री पुरुष समानता केवळ कागदावरच आहे. त्यामुळे या महिला धोरणात पुरुष जनजागृतीसाठी विशेष बाब म्हणून एक परिशिष्ट असावे, असा माझा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.