पुणे –महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले होते. याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
या आंदोलनामध्ये राज्यातील विविध भागांतून सुमारे पाचशे शिक्षक सहभागी झाले होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महासंघांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीमध्ये आमदार डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, जयंत आजगावकर, अभिजित वंजारी, बाळाराम पाटील हे सहभागी झाले होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे आदी उपस्थित होते.
वाढीव पदांना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाईल. आयटी विषयास अनुदानित करण्यासाठी लवकरच माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठीचे प्रशिक्षण आठवड्याभरात सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
उर्वरित मागण्यांसाठी 21 मार्च रोजी महासंघाशी अधिकृतपणे बैठकीचे आयोजन करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अनुकूल निर्णय घेतले जातील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आवश्यकतेनुसार पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे.