पिंपरी – रशिया – युक्रेनमध्ये गेल्या सुमारे 21 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, युद्ध सुरू होताच शहरात तिसऱ्या दिवसांपासून धान्य आणि तेलाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या वस्तूंचा रशिया किंवा युक्रेनशी काहीही संबंध नाही. अशा वस्तुंच्या किंमतीही युद्धाच्या नावाखाली वाढल्या. दुसरीकडे ज्या वस्तुंच्या आयातीचे चक्र तीन महिन्यांचे आहे त्या देखील तिसऱ्याच दिवशी महागल्या. साठेबाजी होत असल्याने खाद्य तेलासह इतर वस्तू महागल्या असल्याचा आक्षेप नागरिक घेत आहेत.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊन लागताच अशाच प्रकारे अनेक वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर ते कमी झाले परंतु लॉकडाऊनपूर्वीच्या किंमतीवर आले नाहीत. या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातून अजूनही ते सावरले नाहीत. त्यातच
रशिया, युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. त्याचाही फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत आहे. तेथून खाद्य तेलासह गव्हाची इतर देशांतून आयात होते. त्यात प्रामुख्याने सूर्यफूल तेलाचा समावेश आहे.
युद्ध सुरू होताच व्यापाऱ्यांनी खाद्य तेलाची साठेबाजी करण्यास सुरवात केली आहे. बाजारात खाद्यतेलासह इतर अन्नधान्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रतिकिलो 120 ते 160 रुपये असणारे खाद्य तेल 160 ते 200 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे किलोमागे सुमारे 40 रुपयांची वाढ झाल्याने महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी सरकराने धोरण आखावे, अशी गृहिणींची मागणी आहे.
युद्ध सुरू होताच तेथून येणारे प्रामुख्याने खाद्य तेल व गव्हाबरोबरच इतर किमतीही व्यापाऱ्यांनी वाढविल्या आहेत. किरकोळ विक्रेते व्यापारीही युद्धाचे कारण पुढे देत किमती वाढल्याचे सांगत आहेत. गेल्या 15 दिवसांत खाद्यतेल्याच्या किमतीमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.
अन्नधान्य येण्यास 3 महिन्यांचा कालावधी
रशिया-युक्रेनहून खाद्य तेल आणि गव्हाची आयात होते. त्याची मागणी केल्यानंतर ते भारतात येण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, युद्ध सुरू होताच व्यापाऱ्यांनी किंमती वाढविण्यास सुरुवात केली आणि सोबतच येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हा निरोपही दिला की किमती भविष्यात आणखी वाढतील. युद्ध सुरू होताच साठेबाजी करून ठेवण्यात आली आहे आणि युद्ध संपल्यावरही खाद्य तेलाचा पुरवठा कितपत होईल व झाला तरी त्यांना जादा पैसे मोजावे लागतील. यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्याकडेही असलेल्या खाद्य तेलाचा साठा करून तो जादा किमतीने विकत आहेत.
तेलाच्या किमती वाढल्या
युक्रेन आणि रशिया हे केवळ गव्हाचे प्रमुख पुरवठादार नाहीत, तर ते जगातील चार प्रमुख खाद्यतेलांपैकी एक असलेल्या सूर्यफूल तेलाच्या जागतिक निर्यातीपैकी 75% पेक्षा जास्त पुरवठा करतात. सूर्यफुलाच्या दरात आठवड्याभरात प्रतिकिलो सुमारे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किमतीमध्येही 3 ते 5 रुपयांना वाढ झाली आहे.
वाढलेल्या किमती
खाद्य तेलाच्या किमतीमध्ये सुमारे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. त्यात पाम ते 110 वरून 160 रुपये प्रतिकिलो झाले आहे. तर सोयाबीन 120 वरून 165, रुपये, सूर्यफूल 160 हून 190 रुपये तर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांच्या किमतीमध्ये प्रतिकिलो 5 ते 6 रपयांनी वाढ झाली आहे.