मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपला पराभवाचा धक्का देत मविआकडून राष्ट्रवादीच्या रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
संजय राऊतांनी कसब्यातील पराभवावरून भाजपवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना,“कालपासून त्यांना घाम फुटलाय. त्यामुळे इतर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्यांची थोडीफार शिल्लक झोपही उडाली आहे. कसब्यात त्यांचा पराभव झालाच आहे. पण चिंचवडमध्ये त्यांचा विजय झालाय हे मी मानायला तयार नाही. आमच्यातलाच एक बंडखोर उभा करून मतविभागणी करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. नाहीतर चिंचवडही कसब्याच्याच मार्गाने गेला असता”, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी कसब्यातील जागा २०२४ मध्ये जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला असताना त्यावरून राऊतांनी टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस पुढच्या मार्गाने निवडून येणार आहेत की मागच्या? असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. “कसब्यात फडणवीस पुढच्या मार्गाने ते जिंकणार आहेत की मागच्या दाराने? हे त्यांनी स्पष्ट करावं. कसब्यात त्यांनी येण्याचे प्रयत्न केले, पण ते येऊ शकले नाहीत. चिंचवडचा दरवाजा फक्त जगतापांमुळे उघडला गेला. ती त्यांची जागा आहे”, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये रामदास आठवलेंच्या रिपाइंला दोन जागा मिळाल्यावरूनही राऊतांनी टोला लगावला. “जगातलं हे मोठं आश्चर्य आहे. महाराष्ट्रात जरी आठवलेंना जागा मिळाल्या नसल्या, तरी नागालँडच्या भूमीवर त्यांनी क्रांती केली त्याबद्दल मी रामदास आठवलेंचे अभिनंदन करतो. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसलाही सात जागा मिळाल्याचं मी अभिनदन करतो”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.