प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 –महापालिकेने आतापर्यंत जवळपास 7 कोटी रुपये खर्च करून शहरात पाच ठिकाणी 100 फूट उंचीचे ध्वजस्तंभ उभे केले आहेत. पण, निदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तरी तेथे ध्वज फडकवावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. केवळ नगरसेवकांच्या अट्टहासाखातर नैसर्गिक स्थिती लक्षात न घेता हे ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत, असा आरोप होत आहे.
शहरातील वाऱ्याच्या वेगामुळे एवढ्या उंचीवर या स्तंभावर लावलेला ध्वज फाटतो. त्यामुळे पालिका काही दिवसच या ठिकाणी राष्ट्रध्वज लावते. त्यामुळे किमान आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्तंभांवर राष्ट्रध्वज फडकत ठेवावा, असे पत्र सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.
याबाबत वेलणकर म्हणाले, “नागरिकांना घरोघरी विनामूल्य तिरंगा ध्वज महापालिकेच्या वतीने वाटण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, त्याचवेळी कात्रज, शनिवारवाडा, येरवडा, खराडीसह पाच ठिकाणी उभे करण्यात आले होते. यासाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हे ध्वज खूप मोठे आणि उंचीवर असल्याने ते फाटतात असे कारण देत गेले अनेक महिने हे ध्वजस्तंभ रिकामेच आहेत. पण, ही अडचण कात्रज येथे पहिला ध्वजस्तंभ उभारला तेव्हाच लक्षात आला होता. तरी अट्टाहासाने आणखी चार ठिकाणी हे ध्वजस्तंभ उभे करण्यात आले आहेत.’