कराड -करोनासारख्या महामारीच्या काळात पालिका प्रशासनाने केलेल्या कामांचा पाढा वाचण्यात आला. तर शहरातील नागरिकांच्या हिताविषयी चर्चा करण्याऐवजी दोन महिने सभाच का झाली नाही? या कारणावरून नगरसेवकांमध्ये शुक्रवारच्या विशेष सभेत चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. हणमंत पवार यांनी नगरसेवकांच्या वादावर नाराजी व्यक्त केली. तर आपत्तीच्या काळात एखाद्याला उणीधुणी काढून टार्गेट केले जात असेलतर आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा सौरभ पाटील यांनी दिला.
यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शुक्रवारी सायंकाळी कराड पालिकेची विशेष सभा पार पडली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते.
करोना महामारीच्या काळात पालिकेची सभा प्रशासकीय कामकाजाच्या काळात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सभा नेहमीप्रमाणे तासभर उशिरा सुरू झाली.
प्रारंभी नगराध्यक्षा शिंदे यांनी पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी करोना काळात केलेल्या कामांची माहिती देत त्यांचे अभिनंदन केले.
नियोजन सभापती विजय वाटेगावकर म्हणाले, मूळ सूचनेत केलेल्या कामांचा पाढाच वाचला जात आहे. एकीकडे शहरातील नागरिक त्रस्त असताना दोन महिने सभा का झाली नाही? असा खडा सवाल उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या, आम्ही सभा घेण्याबाबत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यात करोनाआपत्ती, कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा, आरोग्य तपासणी आदी विषय घेण्याचा निर्णयही घेतला. परंतु, त्यास विरोध केला गेला असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
नगरसेवक हणमंत पवार म्हणाले, नगरसेवकांच्या वादात पालिका कर्मचारी व कराड शहराचे हित दिसत नाही. एकमेकांची उणीधुणी काढण्याचा प्रकार चालला आहे. लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील म्हणाले, प्रशासनावर नगरसेवकांची कमांड राहिलेली नाही. हे नगरसेवकांचे अपयश असल्याचा घणाघात त्यांनी केला.