रांजणगाव गणपती – येथील औद्योगिक वसाहतीमध्ये करोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी 24 मार्चपासून सर्व कंपन्या बंद केल्या होत्या. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा लक्षात घेऊन काही कंपन्या प्रशासनाने सुरू ठेवल्या आहेत. या कंपन्या सुरू ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रितसर परवानग्या घेतल्या आहेत.
यामध्ये राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, कंपन्यांना कामगारांची वाहतूक करणे, उत्पादित मालाची वाहतूक आदी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुसंख्य कामगार हे गावी गेल्यामुळे अपुऱ्या कामगारांवर ही कामे करण्याची वेळ कंपन्यांच्या प्रशासनावर आली आहे.
पुणे शहरामधून बहुतांशी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी येत असल्याने व सध्या हे सर्व अधिकारी रेड झोनमध्ये येत असल्याने अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या आदेशानुसार वर्क फ्रॉम होमचा आदेश दिल्याने कंपन्यांना व्यवस्थापनाची अडचण निर्माण झाली आहे.
परिणामी कंपन्या व कंपन्यांचे उत्पादन सुरू असूनही आवश्यक मनुष्यबळाअभावी कंपनी उत्पादन करू शकत नसल्याने भविष्यात पुरेसे कामगार उपलब्ध झाले नाही तर कंपन्या लवकरच बंद ठेवाव्या लागतील, अशी माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. करोनाच्या दहशतीमुळे अनेक कामगारांनी घरी राहणेच पसंत केले आहे.
मात्र, अनेक कामगार व कंपनी प्रशासनाचे अधिकारी कामावर गेले नाही तर कंपनी कामावरून काढून टाकेल. पगार देणार नाही म्हणून मनामध्ये जीवनमरणाची भीती आहे. केवळ गरजेपोटी कामाला येत असल्याचे चित्र रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये
दिसत आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व त्यांना आवश्यक कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या अशा वीस ते पंचवीस कंपन्या सुरू आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर, कामगारांना आवश्यक सुविधा देऊन कामगार कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. मात्र, शासनाकडून कंपन्यांनी उत्पादित केलेला माल वितरित करण्यासाठी लवकरात लवकर निर्यात सुरू करावी.
– आर. डी. चौधरी,
सेक्रेटरी, रांजणगाव इंडस्ट्रियल असोशिएशन.
हाताला काम नाही, खर्चाला दाम नाही
दि. 24 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील बहुतांश कंपन्या शासनाच्या आदेशानुसार बंद केल्या आहेत. मात्र, कंपन्या बंद झाल्यावर कंपन्यांमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना संबंधित ठेकेदार व कंपनी प्रशासनाने वाऱ्यावर सोडून दिले आहे. हाताला काम नाही आणि खर्चाला दाम नाही, अशा परिस्थितीत कामगार जीवन कंठत आहेत. बहुतांश ठेकेदारांनी कंपन्यांनी पगार करूनही कामगारांच्या दोनवेळच्या जेवणाकडेही साधे लक्ष दिले नाही.
मात्र, रांजणगाव गणपती व कारेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने व स्थानिक दानशूर ग्रामस्थांनी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची दोनवेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या कामगारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, ज्या कंपन्या व ठेकेदार कामगारांच्या जीवावर मोठे झाले. त्या ठेकेदारांनी याच कामगारांच्या सुविधांकडे पाहिले नाही.
त्यामुळे अशा ठेकेदारांकडे परत कामाला न गेलेलेच बरे, अशी प्रतिक्रिया कामगार व्यक्त करू लागले आहेत. लॉकडाऊन उठल्यावर इथे राहण्यापेक्षा गावाला गेलेलेच बरे राहिल, असेही कामगार बोलू लागले आहेत. शिवभोजन योजना, शरद भोजन योजना आदींच्या माध्यमातूनही कामगारांना जेवण उपलब्ध आहे. दरम्यान, काही कंपन्यांचे ठेकेदार कंपनीमध्ये कामाला या तरच तुम्हाला जेवण देऊ; अन्यथा तुम्हाला जेवण देणार नाही, अशी तंबी कामगारांना देत आहेत.
=============================