मुंबई : देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांना रोखण्यासाठी आणि करोनाच्या लसीसंबंधी चर्चा कारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी करोना लसीबाबत आम्ही सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावं, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना करोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. जे करोना निगेटिव्ह आहेत त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
सध्या राज्यात जवळपास २० हजार बेड्स रिकामे आहेत. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांच्या खाली आली आहे ही चांगली बाब आहे असेही चहल यांनी सांगितले. दरम्यान, लोक मास्क लावताना हलगर्जीपणा करत आहेत असं दिसून आलं आहे. मास्क सोबत असतो पण तो लोक तो लावत नाहीत. काही लोक मास्क तोंडाखाली लावतात, पोलीस दिसले की मास्क लावतात आणि नंतर काढून टाकतात. लोकांनी जर मास्कचा वापर केला नाही तर करोनाची दुसरी लाट येईल असंही चहल यांनी सांगितलं. लोकांनी स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाउनचीही गरज भासणार नाही असंही चहल यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान महाराष्ट्रात करोनाच्या लसीकरणासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. तसेच जर काळजी घेतली नाही तर राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची भीती देखील व्यक्त केली.