नगर -दिवसागणिक पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चालला आहे. अलिकडे केवळ वृक्षारोपणाचे फोटोसेशन सुरु आहे. मात्र, लावलेल्यापैकी किती झाडे जगली आणि वाढली, याचा विचार बहुतेकजण करताना दिसत नाहीत. त्यामुळे वृक्षारोपण जसे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा लावलेल्या रोपांचे झाड व्हायल हवे, अशी दक्षता घ्यावी लागेल. अन्यथा पर्यावरणाचा सुरु असलेला ऱ्हास अटळ असल्याची भूमिका ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर यांनी व्यक्त केली.
गुंडेगाव (ता. नगर) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना ते बोलत होते. मोहन शिंदे, बाबासाहेब धावडे, पत्रकार संजय भापकर, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे, माऊली कुताळ यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला.
पर्यावरण जागृतीसाठी खर्च झालेला वेळ मनाला आनंद देऊन जातो. वृक्ष लागवडीने पर्यावरणाचा समतोल राहून निसर्गाचे संवर्धन होते. भावी पिढीला सुखात ठेवायचे असेल, तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. उज्वल भविष्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन यावेळी भापकर यांनी केले. गुंडेगाव येथील तरुण नेहमीच गावाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम करत असतात. तसेच गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम चालत असते. आजचा पर्यावरण दिनचा योग साधत वृक्षाची लागवड करण्यात आली.