नगर -उद्योजक व कामगार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकमेकांशी समन्वय ठेवून कामगाराला न्याय देण्याचे काम करणार आहे. दोघांमधील समस्या आपआपसात चर्चेने सोडविल्यास कुठलाही वाद विकोपाला जात नाही. यासाठी कामगार संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. कामगारांनी कंपनीचे हीत जोपासून उद्योग वाढविण्यासाठी उत्तम दर्जा व उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. कामगारांच्या हिताच्या निर्णयासाठी कामगार कायद्याचा वापर करणार, असे प्रतिपादन नवनिर्वाचित सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले.
नवनिर्वाचित सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांचा स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव आकाश दंडवते, रवी वाकळे, शंकर शेळके, कामगार प्रतिनिधी सुनील देवकुळे, सचिन कांडेकर, कुमार क्षेत्रे आदी उपस्थित होते.
गलांडे म्हणाले की, कामगारांना कामगार कायद्यानुसार सर्व सुख-सुविधा उपलब्ध करून देणे उद्योजकाचे काम असते. यासाठी कामगार कार्यालयाने विशेष लक्ष देऊन कामगारांना न्याय द्यावा. एमआयडीसीमधील कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्योजक व कामगारांना एकत्र बसून निर्णय घ्यावे. कंपनीच्या हिताबरोबर कामगारांच्या हिताचे निर्णय घेत रहावे. कामगार हा कंपनीचा मुख्य घटक आहे. त्यांच्याशिवाय कंपनी चालू शकत नाही. त्यांच्या अडचणींनीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.