कोपरगाव – दिवसेंदिवस उसाचे प्रतिएकरी उत्पादन आणि साखर उतारा घटत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकेपणाने काय केल्याने एकरी उत्पादन वाढेल, यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने कालबद्ध कार्यक्रमाची आखणी केली असून त्याची प्रत्यक्षात बांधावरच अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.
कोल्हे सहकारी साखर कारखाना व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यात उस शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ.निळकंठ मोरे, डॉ. डी. डब्ल्यु. ढवाळ, डॉ. एम. व्ही. बोखारे, कृषीरत्न संजीव माने यांनी जमिनीच्या मशागतीपासून ऊस लागवडीपर्यंत खत व्यवस्थापन, किड नियंत्रण आदींची माहिती देवून क्षारपड चोपण जमिनीची उत्पादकता, आडसाली, पूर्वहंगामी, खोडवा ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांत काय काळजी घ्यायची याचे सचित्रासह माहिती दिली.
कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रति एकरी ऊस उत्पादन वाढ कार्यक्रम पुस्तिकेचे प्रकाशन बिपीन कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, मनेष गाडे, निलेश देवकर, बापूराव बारहाते, त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, सतिष आव्हाड, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कोल्हे म्हणाले की, “शेतकऱ्यांचे प्रती एकरी उसाचे उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून शेतकऱ्यांच्या बांधावर जात मेळावे घेवुन प्रबोधन केले आहे. ऊस वाढीसाठी धडक कृती कार्यक्रम आखून उत्कृष्ट बेणे पुरवून शेतकी विभागातील कार्यरत प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास दहा शेतकरी निवडुन त्यांचे लागवडीपासून ते थेट कारखान्यांत ऊस गाळपास तुटून येईपर्यंतचे नियोजन आखून देण्यात आले आहे.” कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी केले. सुत्रसंचालन उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे यांनी केले.