नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवता यावेत, यासाठी कसोटी मालिकेच्या वेळापत्रकाबाबत बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने सपशेल फेटाळून लावला आहे.
आयपीएलचे रद्द करावे लागलेले सामने पूर्ण करण्यासाठी पाच कसोटी सामन्यांची मालिका एक आठवडा आधी सुरू करण्याचा हा प्रस्ताव होता. आयपीएलचे उर्वरित सामने झाले नाहीत, तर बीसीसीआयला मोठे नुकसान होणार आहे. तसेच सहभागी आठ संघांना अडीच हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.
आता हा प्रस्ताव फेटाळला गेल्याने बीसीसीआयसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी आयपीएलचे 31 सामने पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. मात्र, इंग्लंड क्रिकेट मंडळ द हंड्रेडही स्पर्धा सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. या कारणास्तव वेळापत्रकातील बदलास त्यांचा विरोध असल्याची माहिती मिळत आहे.