सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असूनही इंजिनियर्स इंडियाने प्रदिर्घ काळापासून दमदार वाटचाल केली आहे. 15 मार्च 1965 रोजी भारत सरकार आणि बॅकटेल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन यांनी या कंपनीची स्थापना केली. 1967 मध्ये ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली. आजदेखील या कंपनीचे 51.5 टक्के शेअर्स भारत सरकारकडे असून 33.9 टक्के शेअर्स निरनिराळ्या वित्त संस्था व म्युच्युअल फंडांकडे आहेत. 14.6 टक्के छोट्या गुंतवणूकदारांकडे व अन्य इतरांकडे आहेत. आज ही कंपनी जगातील अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार असून तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा पुरवणारी क्षेत्रे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, सौर आणि परमाणु ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांसाठी तांत्रिक सल्ला देते तसेच अशा प्रकारच्या प्रकल्पांचे व्यवस्थापनही करते.
सरकारी मालकीच्या कंपन्यांचा कारभार आणि त्यांची कामाची पद्धत यावरून अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची जोखिम किती पत्करायची याबाबत गुंतवणूकदार अतिशय विचार करून निर्णय घेत असतो. म्हणजेच जोखिम आणि परतावा याचे गुणोत्तर तो अगदी काटेकोरपणे तपासून पाहतो. सरकारी काय कुठल्याही कंपनीत गुंतवणूक करताना याचा विचार केलाच पाहिजे.
प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच मुलाखत झाली. त्यातील एका वाक्याला फारच प्रसिद्धी मिळाली. ते म्हणतात, “”एचपीसीएल कंपनीच्या शेअरच्या बायबॅकचा सरकारचा निर्णय म्हणजे सरकार किती विचारपूर्वक काम करत असल्याचे निदर्शक आहे. माझ्या पोर्टफोलिओमध्येही काही सरकारी कंपन्यांचे शेअर आहेत. कुठले ते मी सांगणार नाही. ते मी माझ्या बायकोलाही सांगत नाही.”
प्रत्येकाने अभ्यास करून स्वतःची जोखिम घेण्याची क्षमता तपासून गुंतवणूक करावी असा संकेत आहे. त्यामुळे झुनझुनवालांनीही जे संकेत दिले आहेत आणि जी गुप्तता पाळली आहे ती योग्यच आहे. तर आपणही आज अशाच एका सरकारी कंपनीची माहिती घेणार आहोत. काही कंपन्या अतिशय शिस्तबद्ध आणि उत्तम कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा देत असतात. अशाच शिस्तबद्धतेने आणि शांतपणे वाटचाल करणारी कंपनी म्हणजे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड. ही चक्क सरकारी मालकीची कंपनी आहे.
15 मार्च 1965 रोजी भारत सरकार आणि बॅकटेल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन यांनी या कंपनीची स्थापना केली. 1967 मध्ये ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली. आजदेखील या कंपनीचे 51.5 टक्के शेअर्स भारत सरकारकडे असून 33.9 टक्के शेअर्स निरनिराळ्या वित्त संस्था व म्युच्युअल फंडांकडे आहेत. 14.6 टक्के छोट्या गुंतवणूकदारांकडे व अन्य इतरांकडे आहेत.
आज ही कंपनी जगातील अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार असून तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा पुरवणारी क्षेत्रे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, सौर आणि परमाणु ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांसाठी तांत्रिक सल्ला देते तसेच अशा प्रकारच्या प्रकल्पांचे व्यवस्थापनही करते. या क्षेत्रातील प्रकल्पांच्या अगदी प्रारंभीच्या आराखड्यापासून ते डिझाईन, त्यातील इंजिनियरिंग, त्यासाठी लागणाऱ्या बाबींची उपलब्धता, बांधकाम, प्रकल्प उभारण्यासाठी लागणारे व्यवस्थापन ते प्रकल्प सुरू करुन देण्यापर्यंतच्या कामात कंपनीचा सहभाग असतो. असे प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्यातील आधुनिक उपकरणे चालवणे, हाताळणे, त्यांची देखभाल, त्यातील पर्यावरणाशी निगडीत बाबी, सुरक्षासेवा अशा सगळ्याच पातळ्यांवर इंजिनियर्स इंडिया सेवा देते.
आजपर्यंत या कंपनीने 519 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प हाताळले आहेत आणि 5000 पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील इतर कामगिरी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. 10 ग्रीनफिल्ड रिफायनरीसह 82 रिफायनरी, 11 पेक्षा जास्त मोठे पेट्रोकेमिकल प्रकल्प, 44 पेक्षा जास्त तेल आणि वायू प्रक्रिया प्रकल्प तसेच अनेक पाईपलाईन प्रकल्प, खाणी व धातूसंदर्भातील प्रकल्प, बंदरे, स्टोअरेज टर्मिनल्स असे प्रकल्प या कंपनीने उभारले आहेत आणि यशस्वीपणे सांभाळले आहेत.
याचबरोबर पायभूत सुविधा पुरवणाऱ्या अनेक प्रकल्पांना सल्ला व सहकार्य केले आहे. विमानतळ, महामार्ग, उड्डाणपूल, नदी व रेल्वेसाठीचे उड्डाणपूल, पाणी व सांडपाणी प्रकल्प अशा विविध ठिकाणी कंपनीने स्वतःची उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे नाव अनेक मोठ्या प्रकल्पांमुळे जागतिक स्तरावर गेले आहे. कामामध्ये अधिक गुणवत्ता आणण्यासाठी कंपनीने गुरगांव येथे शोध व विकास केंद्र उभारले आहे. 2017 मध्ये कंपनीने 4.19 कोटी शेअरची बायबॅक प्रक्रिया पूर्ण केली.
आज आपल्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही कंपनी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया व स्वच्छ भारत यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे अतिशय सावकाश पण दमदारपणे वाटचाल करत असलेली ही कंपनी भविष्यात चांगला परतावा देऊ शकते.
(शुक्रवारचा बंद भाव – एनएसई – 70.70 रु. )
– सुहास यादव