पुणे (प्रतिनिधी) : औंध, बोपोडी, खडकी, औंधरोड पासून पिंपरीपर्यंत वाहतूक कोंडी, खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि लोकांना होणारा प्रचंड मनस्ताप याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने भाजपातर्फे आज बोपोडी – खडकी मार्गावर तसेच खडकी स्टेशन परिसरातील साई मंदिर येथे आज आंदोलन करण्यात आले.
भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने, तसेच नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांना देण्यात आले.
यावेळी भाजप शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड, पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष मुकेश गवळी, ज्येष्ठ नेते गोपाळ नेटके, खडकी भाजप अध्यक्ष धर्मेश शहा, शिवाजीनगर भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, राहुल कांबळे, अनिल माने, रोहित झणझणे,सचिन घोरपडे, अविराज हुगे, धनंजय दरे, संतोष भिसे, योगेश केरकर, शशिकांत भालेराव, धीरज पंगुडवाले,राजेश अगरवाल, युवराज जैन, विजय ढोणे, सुरज ढोबळे, हेमा आरमोघम, सुरेखा कांबळे, रोहिणी कांबळे, संकेत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई – पुणे महामार्गावर बोपोडी ते संविधान चौक येथे मेट्रो साठी करण्यात येणाऱ्या ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले असूनही, या मार्गावरील शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक खडकी मार्गे वळवण्यात आली आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक ही या मार्गावर वळवण्यात आली. या मार्गावरील रस्ता अरुंद आहे तसेच या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत. यामुळे बोपोडी, खडकी, औंधरोड पासून पिंपरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून नागरिक औंध रोड खडकी स्टेशन, रेंज हिल्स या मर्गाने जात आहेत. सकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली असते. यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक, व्यापारी यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबई – पुणे हायवे वर खडकी स्टेशन जवळील कुंदन हेरीटेज सोसायटी समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर तसेच मानाजीबाग येथील किर्लोस्कर कंपनी जवळील रेल्वेरूळाजवळ पावसामुळे रस्ता खराब झाला आहे. या दोन्ही रस्त्याला वाहनांची प्रचंड वर्दळ असते. तेथून प्रवास करताना दुचाकी घसरून दुचाकीस्वार जखमी होतात. यासाठी येथे काँक्रीटीकरण करणे किंवा पेव्हिंग ब्लॉक बसवणे गरजेचे आहे.
पुणे महानगरपालिका, मेट्रो प्रशासन तसेच वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदन देऊन तीनही विभागाने एकत्रित बसून या प्रश्नावर मार्ग काढावा व लोकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे. मात्र वारंवार मागणी करूनही प्रशासन याबाबत गांभीर्याने लक्ष घालत नाही. या निषेधार्थ आज नाईलाजास्तव हे आंदोलन केले. या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन लोकांना दिलासा न दिल्यास पुढील काळात आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे भाजपाने दिला आहे.