लखनऊ : उत्तर प्रदेशमधील शेतकरी आक्रमक झाले असून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रींमडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांना अटक व्हावी या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथील 4 शेतकरी आणि 1 पत्रकार यांच्या हत्येप्रकरणावरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत.
गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आज संध्याकाळपासून देशभरातील शेतकरी एकत्र जमण्यास सुरुवात होणार आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडात जे शेतकरी निर्दोष असूनही कारावास भोगत आहेत, त्यांची तात्काळ सुटका करावी. त्यांच्यावरील खटले तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, सर्व पिकांना आधारभूत किंमत देण्यासाठी आणि एमएसपीपेक्षा जास्त असलेल्या सर्व पिकांच्या विक्रीची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, किसान आंदोलनादरम्यान केंद्रशासित प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले खटले तत्काळ मागे घेण्यात यावेत. वीज बिल मागे घेण्यात यावे. भारतातील तमाम शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारे कर्जाचे ओझे कमी झाले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. उत्तर प्रदेशातील साखर कारखानदारांच्या वतीने शेतकऱ्यांची थकबाकी तत्काळ देण्यात यावी. लखीमपूर व इतर जिल्ह्यांतून देशाच्या विविध प्रांतांतून वर्षानुवर्षे जंगल वसवून आलेल्या शेतकर्यांना जमीन बेदखल करण्याच्या नोटिसा देणे बंद करावे, या प्रमुख मागण्या उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुलं शेतकरी आता एकत्र जमायला सुरुवात झाली असून, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.