- नारी शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला विचारला जाब
कर्जत : कर्जत शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी सुद्धा कर्जत नगर परिषद प्रशासन याबाबत आवश्यक ती सकारात्मक, ठोस पाऊले उचलत नसल्याने या विरोधात नारी शक्ती संघटनेने आवाज उठवत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत जाब विचारला.
सुरवातीच्या काळात जेव्हा करोना “पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले, तेव्हा नगर परिषदेने जंतूनाशक फवारणी, बाजारपेठेत सॅनिटायझर स्प्रे प्रवेशद्वार, शहरातील स्वच्छता अशा मोहीम राबविल्या. त्याच कालावधीत काय तर स्वच्छता हवी तसेच रस्ते स्वच्छ करण्यासाठी अन्य सदस्यांना विश्वासात न घेता जनतेच्या पैशाच्या कररुपी निधीतून लाखो रुपयांची रस्ते साफ करणारे अद्ययवत वाहन खरेदी केली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सुरवातीच्या एक दोन आठवडे या वाहनाने शहरातील काही प्रभागातून फेरफटका मारला, त्यानंतर हे वाहन गायब झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या वाहनाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी महिलांना समर्पक उत्तरे देण्याचे टाळले. महिलांनी या समस्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, स्पष्ट केले. या प्रसंगी ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, कोयल कान्हेरीकर, अर्चना हगवणे, कमल जाधव, ऍड. प्रीती तिवारी, वर्षा डेरवणकर आदी नारी शक्तीच्या महिला सदस्यता सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे नगरपरिषदेने लवकरात लवकर कार्यवाही केली नाही, तर नारी शक्तीचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
करोना महामारीत नगरपरिषदेने नागरिकांसाठी योग्य ती काळजी घेतली जात नाही. तसेच कीटकनाशक फवारणी करणे अपेक्षित असताना तसे केले गेले नाही.
– स्विटी बार्शी, सदस्य, नारीशक्तीनगरपरिषदेने कोविड-19 मध्ये नऊ लाखांचा निधी खर्च केला, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे, मात्र नक्की कुठे केला याचे स्पष्टीकरण केले नाही, ते करदात्यांनाही समजले पाहिजे.
– अर्चना हगवणे, सदस्या, म्हाडा कॉलनीगर्दीच्या ठिकाणी फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्यास 500 रुपये दंड आहे. असे वारंवार सांगण्यात येते, तसे नगरपरिषदेने फलक लावले आहेत. परंतु खुलेआम मास्क न लावणारे फिरताना दिसून येत असताना त्या व्यक्तींवर कारवाई होत नाही. याची दखल प्रशासनाने घ्यावी.
– कोयल कण्हेरीकर, सदस्या, दहिवली.शहरात धुरीकरण निर्जंतुकीकरण फवारणी कुठेच केली गेली नाही. मग जनतेचा पैसा कुठे गेला याची माहिती नागरिकांना व्हावी.
– ज्योती जाधव, सदस्या, बाजारपेठ.