नवी दिल्ली – वीजेवर चालणारी वाहने हेच आता वाहन उद्योगाचे भवितव्य असल्याने वाहन उद्योगाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे असे निती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.
भारतीय वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या एका संघटनेच्या कार्यक्रमात के बोलत होते. ते म्हणाले की वीजेवरील वाहनांना लागणाऱ्या बॅटऱ्यांच्या किंमती येत्या दोन वर्षांमध्ये आणखी कमी होतील त्यानंतर ही वाहने ग्राहकांना किफायतशीर ठरू शकणार आहेत.
वाहन उद्योग क्षेत्रातील नाविन्य, संशोधन आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी निती आयोगामार्फत सर्वंकष प्रयत्न जारी आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की देशात आता वीजेवरील वाहनांचे युग अवतरणार आहे त्यासाठी आपण सर्वांनीच सज्ज राहिले पाहिजे असे ते म्हणाले.
इलेक्ट्रीक व्हेईकल उत्पादन क्षेत्रात भारत हा सर्वात पुढारलेला देश होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. इलेक्ट्रीक मोबिलिटीला चालना देण्यासाठी अधिक संशोधनही होण्याची गरज असून वाहन उद्योगांनी आता या संशोधनात गुंतवणूक करण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.
इलेक्ट्रीक वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांची विक्री गेल्या तीन वर्षात चार पटींनी वाढली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की या कालावधीत देशात एकूण 5 लाख 17 हजार वीजेवर चालणारी वाहने विकली गेली आहेत.