Energy exports – भारताचा विकासदर निर्यात वाढविल्याशिवाय वाढणार नाही. ऊर्जा निर्यात करून आपला विकास दर वाढविण्याचा प्रयत्न करू शकतो, असे जी-20 चे शेरपा अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.
भारताकडे परंपरागत ऊर्जेबरोबरच अक्षय ऊर्जा निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. त्याचा फायदा भारताने घेण्याची गरज आहे. भारताने जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करण्यात पुढाकार घेतल्यानंतर त्याचा भारताला मोठा फायदा होणार आहे. या क्षेत्रात भारताने संशोधन आणि विकास सध्याच्या गतीने चालू ठेवावा. त्यामुळे भारत जगाला स्वच्छ ऊर्जा पुरवू शकेल.
भारताने ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. या अक्षय ऊर्जेसंबंधातील इतर तंत्रज्ञानातही भारताने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हे करीत असताना भारताने कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि इतर वस्तूंची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
जर पुढील वीस वर्षे भारताने दहा टक्के विकासदर साध्य केला तर 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 35 लाख कोटी डॉलरची होऊ शकेल. त्या अवस्थेत भारतातील दरडोई उत्पन्न विकसित देशातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्न इतके होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजीटल तंत्रज्ञानात आघाडी (Digital technology)-
डिजिटल तंत्रज्ञानात भारताने आघाडी घेतली आहे. भारत या क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करू शकतो. तसेच यातून निर्यात वाढविण्याच्या संधी आहेत. विकसित देशांमध्ये सध्या गुगल, अॅपल, मेटा, अमेझॉन, फेसबुक इत्यादीच्या आधारावर नाविन्यपूर्ण उत्पादने तयार केली जातात. मात्र भारतामध्ये त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन डिजिटल तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे. अशी क्षेत्र ओळखून या वस्तूंचा किंवा सेवाचा पुरवठा जागतिक पातळीवर करण्यासाठी भारताने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच झाले तर भारताचा विकासदर सध्याच्या सात टक्क्यावरून दहा टक्क्यावर जाऊ शकेल. (Energy exports)