शेरखान शेख
शिक्रापूर -लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये सोशल मीडियावर “लक्ष्य ग्रामपंचायत’, “लक्ष्य वॉर्ड क्रमांक’, “भावी सरपंच’ असे संदेश व चित्रफीत फिरू लागल्या आहेत, तर गावातील गायब झालेले पुढारी चौकाचौकांत दिसू लागले आहेत. काही इच्छुकांनी तर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपण्यापूर्वीच करोनाचे संकट आले, त्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारच्या वतीने विविध नियम लादण्यात आले होते. अनेक परप्रांतीय, कामगार, मजूर यांना या लॉकडाऊनचा सामना करावा लागला. यावेळी काहींना मदतीची गरज असताना गावातील नेते, पुढारी, पदाधिकारी गायब झाले होते. मोजक्या पदाधिकाऱ्यांवर मदत करण्याची वेळ आली.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यावेळी गावपुढाऱ्यांनी प्रशासकपदाची मागणी केली होती.
मात्र, प्रशाक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांची वर्णी लागल्याने या गाव पुढाऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याने ते दिसेनासे झाले होते. तर आता लवकरच निवडणूक लागणार असल्याने गायब झालेले सर्व पुढारी गावात गुडघ्याला बाशिंग बांधून दिसू लागले आहेत. त्यामुळे गाव पुढारी नावापुरतेच का, असा प्रश्न उभा राहिला आहे.