नगर – जिल्हा बॅंक ही शेतकरी व साखर कारखान्यां साठी कामधेनू असून तेथे पक्षीय राजकारणा बाजूला ठेवण्यात येते. मात्र महाविकास आघाडीने अध्यक्षपदाच्या निवडीत पक्षीय राजकारण आणले. भाजपच्या संचालकांना बाजूला ठेवून केवळ महाविकास आघाडीच्या संचालकांची बैठक घेतली. तसेच एक वर्ष भाजपला संधी द्या अशी विनंती करण्यात आली होती. तीही महाविकास आघाडीने मान्य केली नाही. त्यामुळे भाजपला बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक करावी लागली. त्यात मदत झाल्याने एकामताने मी विजयी झाले, असे मत बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कर्डिले म्हणाले की, पक्षीय राजकारण बॅंकेत नको होते. पण त्यांनी सुरवात केली. त्यामुळे भाजपला देखील पक्षीय राजकारण सहकारात आणावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री संचालकांची बैठक घेऊन निवडणूक करण्याचे आदेश दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांनी साथ दिल्याने व आमदार मोनिका राजळे, संचालक अंबादास पिसाळ, विवेक कोल्हे हे बरोबर राहिल्याने हे शक्य झाले. जिल्हा बॅंके ही शेतकऱ्यांची बॅंक असल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका राहिल.
तसेच आता निवडणूक झाली असून सर्व संचालकांना बरोबर घेऊन पक्षीय राजकारण न करता शेतकरी व साखर कारखान्यांच्या दृष्टीने गरजेचे निर्णय घेण्यात येतील. अध्यक्षपदाच्या निवडीत खासदार सुजय विखे यांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे आज भाजपकडे जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद आले असल्याचे कर्डिले म्हणाले. कमी संख्या असतांना हे केवळ विखेंमुळे शक्य झाले.