नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने सोमवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. करोनाची प्रकरणे पाहता आयोगाने निवडणूक प्रचाराशी संबंधित निर्बंधांमध्ये मोठा दिलासा दिला आहे. नव्या सूचनांनुसार आता उमेदवार आणि कार्यकर्ते 20 च्या संख्येने घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील.
निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पक्ष किंवा पक्षाचे उमेदवार आता 1000 लोकांच्या उपस्थितीत सभा घेऊ शकणार आहेत. यामध्ये स्थानिक एसडीएमच्या मार्गदर्शक सूचनांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. रोड शो, पदयात्रा, मिरवणुकांवर 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंदी कायम राहणार आहे.
घरोघरी प्रचारासाठी लोकांची संख्या 10 वरून 20 करण्यात आली आहे. या दरम्यान करोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे. बंद सभाग्रहात सभांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या 300 वरून 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र सभागृहाच्या क्षमतेपैकी केवळ 50% लोक सभेला उपस्थित राहू शकतात. एसडीएमएने जारी केलेल्या सूचनांचीही काळजी घ्यावी लागेल.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांना केवळ करोनाशी संबंधित योग्य उपचार आणि मार्गदर्शक तत्त्वांसह प्रचार करण्याची परवानगी असेल. या बदलांव्यतिरिक्त, 8 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या सर्व सूचना आणि निर्बंध लागू राहतील.
पाच राज्यांतील निवडणुकांची तारीख –
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
कोणत्या राज्यात किती जागा?
उत्तर प्रदेश – 403 जागा
पंजाब – 117 जागा
उत्तराखंड 70 जागा
मणिपूर – 60 जागा
गोवा – 40 जागा