नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे मतदान देखील झाले आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. निवडणूक आयोग देखील कमी मतदानामुळे चिंतेत आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पहिल्या टप्प्यातच मतदानात चार टक्क्यांची घट झाली आहे. एकूणच निवडणुकीबद्दल मतदारांमध्ये निरुत्साह असून मतदान वाढवण्यासाठी उर्वरित सहा टप्प्यांत अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
यासाठी निवडणूक आयोग देखील प्रयत्नशील आहे. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली होती. मात्र, तरीही पहिल्या टप्प्यात मतदानात घटच झाल्याचे आकडे सांगत आहेत.
पहिल्या टप्प्यात 19 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 102 मतदारसंघांत मतदान झाले. या मतदारसंघांमध्ये 16 कोटींहून जास्त मतदार आहेत, तरी मतदानासाठी 65.50 टक्के मतदारच घराबाहेर पडले.
निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर टर्नआऊट’ अॅपमध्ये मतदानांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात 102 मतदारसंघांपैकी केवळ 10 मतदारसंघांमध्येच जास्त मतदान झाले. दरम्यान, 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात ६९.५० टक्के मतदान झाले होते.
राज्य मतदानाची टक्केवारी :
महाराष्ट्र 61.87
तामिळनाडू 69.46
उत्तर प्रदेश 60.25
राजस्थान 57.26
बिहार 48.88
मध्य प्रदेश 67.08
आसाम 75.95