जळगाव – अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का? असा रोखठोक सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. पक्षाचा निर्णय सामूहिक आहे, असं समजून मी 40 वर्ष पक्षाच्या आदेशाचं पालन करत आलो. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे ते नेते होते, मुख्यमंत्री होते, दुसऱ्यांना क्लीन चिट दिली, तशी मलाही देता आली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव येथे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एकनाथ खडसे म्हणाले, विधानसभेला युती केली असती तर चित्र वेगळे असते. विधानसभेनंतरही शिवसेनेसोबत युती असती तर दोन-तीन वर्षे आम्ही (भाजप) सरकारमध्ये असतो. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला हवे होते. अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का? असा सवाल खडसेंनी विचारला.
देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला. मी फडणवीसांना व्हिलन ठरवले नाही, फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मी तिथे गेलो, त्यांना सांगितले. आधी सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचे, पण आता भाजप ही व्यक्तिकेंद्री झाली आहे, म्हणजे एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी मान्य करायचा, अशी खंतही खडसे यांनी मांडली.
शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून मला ऑफर होत्या. पण संघटनात्मकदृष्ट्या विस्तारासाठी राष्ट्रवादीला येथे (मुक्ताईनगर आणि जळगाव) अधिक वाव आहे, कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, राष्ट्रवादीकडे सक्षम आणि मोठं नेतृत्व नाही, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दहा- बारा आमदार संपर्कात
दरम्यान, माझ्या संपर्कात भाजपचे 10-12 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असेही खडसे यांनी सांगितले.