नवी दिल्ली – देशातील आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते. या प्रादेशिक भाषांमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत परीक्षा देता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसारच हा निर्णय असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यासंबंधी पोखरियाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. आयआयटीमधल्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई ही परीक्षा घेण्यात येते. आयआयटी आणि इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आयआयटी जेईई ही परीक्षा घेण्यात येते.
त्यासाठी विद्यार्थी दहावीच्या आधीपासूनच तयारी करत असतात. पण मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून उत्तर लिहिणे जास्त सोयीचे असते. राज्य पातळीवरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून उत्तर लिहिण्याची मुभा असावी, असे पोखरियाल यांनी सांगितले.
पोखरियाल म्हणाले, देशातील 22 प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यायचे आमचे धोरण आहे. कुठलीही एक भाषा लादायचा यामागे उद्देश नाही. इंग्रजी नको असे आमचे म्हणणे नाही. पण भाषा निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवे आणि भाषा ही त्यांच्या ज्ञानसंपादनात किंवा शिक्षणात अडथळा ठरता कामा नये, असा या धोरणामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यापूर्वी ही परिक्षा इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीनच भाषांमध्ये घेण्यात येत होती.