बारामती/ डोर्लेवाडी – आमदार नसल्यामुळे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जात आहेत. तेथे त्यांना आमदारकीसह मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आठवले यांनी (दि. 22) बारामती तालुक्यातील कऱ्हावागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, खडसे यांच्याबरोबर भाजपचे 15 ते 16 आमदार जातील, असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांना राज्य सरकाने तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्राकडून मदतीसाठी पत्र लिहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह आपण केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहे. बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तात्काळ पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, राज्यात सोलापूर, सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राची मदत मिळवू. मात्र, राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकारने यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रचंड पावसाने कऱ्हावागज येथील नदीवरील पूल वाहून गेला आहे. पाणी दलितवस्तीमध्ये घुसल्याने नुकसान झाले. त्याचे लवकर पंचनामे होणे आवश्यक आहे.