सातारा -राज्यातील सुमारे 11 लाख शेतकऱ्यांसाठी आठ हजार कोटी रुपयांची रक्कम खरीप हंगामासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी दिली. श्री. पाटील म्हणाले, ”ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने करोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या.
कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व इतर बॅंकांमध्ये कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे या बॅंकांनी गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यामध्ये राज्य सहकारी बॅंकेच्यावतीने आणि काही बॅंका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यामध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे.” जवळजवळ साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे आठ हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.